Monday, June 1, 2020

गांधीजी आणि अस्पृश्यता



गांधीजींच्या अस्पृश्यांबद्दलच्या भूमिकेबद्दल बरीच चर्चा असते. त्यांची अस्पृश्यतेसंबंधीची मते सतत विकसित होत गेलेली आहेत. या लेखात अस्पृश्यता निवारण करण्याकरिता गांधीजींनी व्यक्त केलेली मते बरीच शेवटच्या काळातील आहेत. ती समजून घेऊनच गांधीजींचा अस्पृश्यतेबद्दलचा दृष्टिकोन आपल्याला समजू शकेल. लेख मोठा असला तरी समजून घेतला पाहिजे असा आहे. - ब्रिजमोहन
-------------------
३७२. हरिजन सेवक संघाच्या सदस्यांशी चर्चा
(हरिजन सेवक संघ ऑन फाय म्हणजे हरिजन सेवक संघावर कठोर टीका या प्यारेलाल यांच्या लेखावरून.)
पाचगणी,
[जुलै २०, १९४६] (गांधी १९१५ ते ४८वरून)
प्रश्न - साम्यवादी पक्षाने भंग्यांची संघटना व्यवस्थितपणे उभारली आहे आणि संप इत्यादींच्या माध्यमाने त्यांनी त्यांना त्यांचे अधिकार मिळवून दिले आहेत. परंतु हरिजन सेवक संघाचे काम मात्र हरिजनांच्या कल्याणापर्यंतच सीमीत राहिले आहे. यामुळे लोकप्रियतेच्या बाबतीत ते साम्यवाद्यांच्या कामाशी यशस्वीपणे स्पर्धा करू शकत नाही. यामुळे तुम्हाला असे वाटत नाही काय की हरिजन सेवक संघाने आपल्या धोरणात आणि कामाच्या पद्धतीत बदल केला पाहिजे?
उत्तर - काय योग्य आहे यावरून आपण आपले धोरण ठरवले पाहिजे, सवंग लोकप्रियता मिळवण्याच्या दृष्टीने नाही. हरिजन सेवक संघाचा विश्वास असेल की तो योग्य मार्गावर चालत आहे तर इतर काय करतात वा करत नाहीत याचा विचार न करता त्याने त्या मार्गाचे अनुसरण करणे सुरू ठेवले पाहिजे. अशा प्रकारे आपण संघटनाही बांधू शकतो वा संप करण्याकरिताही त्यांना प्रेरीत करू शकतो. असे आपण राजकीय वा तत्सम हेतूने नाही तर हरिजनांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याकरिता करू शकतो.
प्रश्न - हरिजनांमध्ये अशी भावना पसरली आहे की कॉंग्रेस हरिजनांच्या न्याय्य अधिकारांकडे लक्ष देण्याऐवजी मुसलमानांच्या मागण्यांकडे अधिक लक्ष देत आहे. या संबंधी तुमचे मत काय आहे?
उत्तर - कॉंग्रेस ही राजकीय संघटना असल्यामुळे ती राजकीय दडपणाला बळी पडण्याची जास्त शक्यता आहे. आणि हरिजनांपेक्षा मुसलमान असे दडपण आणण्यात फार जास्त सक्षम आहेत. ती जर त्या दडपणाला बळी पडत असेल तर तिला त्याची किंमत मोजावी लागेल. परंतु हरिजन सेवक संघ अराजकीय संघटना आहे. यामुळे लाभहानीचा विचार न करता हरिजन सेवक संघाने हरिजनांबद्दलच्या आपल्या प्राथमिक कर्तव्यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे.
प्रश्न - श्यामलाल यांच्याशी नुकताच तुमचा जो पत्रव्यवहार झाला होता त्यात तुम्ही म्हणाला होता की जातिव्यवस्था पाळामुळासह छाटून टाकल्याशिवाय अस्पृश्यता समूळ नाहीशी करता येणार नाही. असे असेल तर मग तुम्ही अस्पृश्यता निवारण करण्याच्या कामाला जातपात मिटवण्याचा एका व्यापक धर्मयुद्धाचा भाग का करत नाही? तुम्ही जर मूळ कापले तर शाखा आपोआपच वाळून जातील.
उत्तर - माझा एखादा दृष्टिकोन असणे ही एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट संपूर्ण समाजाला पूर्णपणे स्वीकारार्ह होणे ही दुसरी गोष्ट आहे. मला आशा आहे की माझा मनोविकास सतत होत आहे, ते सतत पुढे जात आहे. सर्व लोक त्याच्याबरोबरीने पुढे जाऊ शकत नसतील. यामुळे मी शक्य तितका धीर धरून हळूहळू पुढे सरकण्यावर समाधान मानले पाहिजे. नुकताच नवजीवनने माझे ‘वर्णव्यवस्था’ हे जे पुस्तक प्रकाशित केले त्याच्या प्रास्ताविकात (पाहा वर्णव्यवस्थेला प्रास्ताविक, मे ३१, १९४५) तुम्ही पाहिलेच असेल की तत्त्वतः मी तुमच्या तत्त्वाशी पूर्णपणे सहमत आहे. मी जर १२५ वर्षे जगलो तर संपूर्ण हिंदू समाजात माझ्या विचाराप्रमाणे परिवर्तन घडवून आणू शकेन अशी माझी अपेक्षा आहे.
प्रश्न - आजच्या परिस्थितीत हरिजनांना प्राथमिक, सामाजिक आणि आणि नागिरक अधिकार मिळावे म्हणून निदान काही विशिष्ट ठिकाणी तरी आंदोलन करण्याचा सल्ला तुम्ही तथाकथित सवर्ण हिंदूंना द्याल काय? या कारणाकरिता आवश्यकता पडली तर सवर्ण हिंदूंच्या विरोधात सत्याग्रह करण्याचा सल्ला हरिजन सेवक सघाला द्याल काय?
उत्तर - एक संघटना म्हणून संघाला सवर्ण हिंदूंच्या विरोधात सत्याग्रह करण्याचा सल्ला मी देणार नाही. परंतु वैयक्तिक पातळीवर सवर्ण हिंदूंच्या विरोधात आपापल्या ठिकाणी असे सत्याग्रह संघटित करण्याचा मी केवळ सल्लाच देणार नाही तर अपेक्षाही करीन की संघाच्या सदस्यांनी आपापल्या ठिकाणी हे काम करावे. त्यांनी जर योग्य भावनेने असे कोणते पाऊल उचलले तर मी त्याला निश्चितच पाठिंबाही देईन. असे करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
प्रश्न - प्रांतांमध्ये लोकप्रिय सरकार नसले तरी हरिजन सेवक संघाने हरिजनांच्या मंदिरप्रवेशाकरिता जोरदार कार्यक्रम चालवावा असा सल्ला तुम्ही द्याल काय?
उत्तर - शक्य आहे की मी असे करेन. सध्यासुद्धा हळू का होईना काही ठिकाणी असे केले जात आहे हे मला माहीत आहे. याची गती वाढली तर मला खरोखरच आनंद होईल.
प्रश्न - संघाचे सदस्य अस्पृश्यांबरोबर जेवण घेण्याकरिता नकार देऊ शकतात काय?
उत्तर - एक काळ होता की जेव्हा सहभोजन हा अस्पृश्यता निवारण कार्यक्रमाचा अविभाज्य भाग नाही असे मी म्हणत होतो. व्यक्तिशः मी त्या बाजूने होतो. आज मी त्याला प्रोत्साहन देतो आहे. आणि मी वर उल्लेखिलेली प्रस्तावना जर तुम्ही पाहिली तर खरे म्हणजे मी अजूनच पुढे गेलो असल्याचे तुम्हाला आढळून येईल.
प्रश्न - हरिजनांना राजकीय अधिकार मिळवून देण्याकरिता ग्रामपंचायती, नगरपालिका आणि विधिमंडळे यांच्यात हरिजनांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे म्हणून हरिजन सेवक संघाने प्रयत्न करू नये काय?
उत्तर - होय, असे निश्चितच झाले पाहिजे. याकरित कितीही प्रयत्न केले तरी ते कमीच ठरतील.
प्रश्न - हरिजन छात्रालयात आणि वयस्कर हरिजनांच्या सभेत संघाने हिंदू धर्माच्या तत्त्वांची शिकवण द्यायला नको काय?
उत्तर - हरिजन मुले आणि वयस्कर हरिजन यांना हिंदू धर्माच्या मूलभूत सिद्धांतांचा परिचय करून देणे हे संघाचे प्राथमिक कर्तव्य असले पाहिजे. त्यांना जर हे ज्ञान नसेल तर शक्य आहे की मोठे झाल्यानंतर ते हा धर्म सोडून देतील. असे झाले तर याची जबाबदारी त्या लोकांवर असेल ज्यांनी हे आवश्यक ज्ञान त्या हरिजनांना दिले नाही.
सवर्ण हिंदूंमध्ये प्रचार कार्य करण्याकरिता संघाने विशेष प्रशिक्षण देऊन प्रचारक तयार करायला नको काय असे गुंटूर येथील विनय आश्रमाचे श्री सीताराम शास्त्रींनी विचारले. ते म्हणाले की मला पुरेशी मदत करण्यात आली तर अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र  माझ्या आश्रमात सुरू करण्याची माझी तयारी आहे.
परंतु या सूचनेच्या व्यावहारिकतेबद्दल गांधीजी फार साशंक होते. वास्तवात श्री घनश्यामदास बिर्ला यांनी हा प्रश्न अनेक वर्षांपूर्वी उपस्थित केला होता व पूर्ण चर्चेनंतर तो मुद्दा सोडून दिला होता. गांधीजी म्हणाले की संघाचे सदस्य या आदर्शाप्रमाणे वागले तरी माझे पूर्ण समाधान होईल.
प्रश्न - संघात हरिजन प्रतिनिधी ठेवण्याची वा संघाच्या कार्यकारिणीत किमान एक हरिजन प्रतिनिधी ठेवण्याची प्रथा आपण पाडायला नको काय?
मॅकडोनाल्ड सरकारने अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देण्याकरिता घेतलेला निर्णय पुणे करारानंतर बदलवण्याकरिता भाग पडल्यानंतर .हरिजन सेवक संघाची स्थापना कशा प्रकारे झाली होती याचा इतिहास याचे उत्तर देत असताना गांधीजींनी सांगितला. गांधीजी म्हणाले की त्या वेळी असे जाणवले की समाजाचा विनाश होऊ द्यायचा नसेल तर हिंदू धर्माला स्पर्शास्पर्शाच्या भावनेपासून पूर्णपणे मुक्त करावे लागेल. याकरिता हिंदू धर्माच्या खऱ्या हृदयपरिवर्तनाची आणि आपल्या पापाचे प्रायश्चित्त घेण्याची आवश्यकता होती. याच उद्देशाने हरिजन सेवक संघाची स्थापना करण्यात आली होती.
गांधीजी पुढे म्हणाले की या दोन्ही प्रस्तावांना माझा विरोध आहे. मला माहीत आहे की प्राप्त परिस्थितीत संघाच्या काही मंडळांमध्ये (बोर्डांमध्ये) हरिजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. परंतु ठक्कर बापांच्या दुबळेपणाला दिलेली ही सूट होती. मी सांगितले आहे की हरिजन सेवक संघ हा पश्चात्तापदग्ध पापी लोकांचा संघ आहे व अस्पृश्यतेची भावना असणाऱ्या तथाकथित हिंदूना प्रायश्चित्त घ्यायला लावणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. संघात हरिजनांना सामील करून घेणे ही तर केवळ डोळ्यात धूळ फेकण्यासारखी आणि मनाची समजूत घालण्यासारखी गोष्ट होईल. असे जरी केले तरी हरिजनांची संघात कोणतीच भूमिका राहिली नसती आणि त्यांना संघात जरी घेतले तरी थोड्या दिवसात ते निघून गेले असते. समित्या ज्या प्रकारे काम करत आहेत त्यांचा मला जो वैयक्तिक अनुभव आला त्यावरून मी हे सांगत आहे. मला माहीत आहे की संघ आपल्या आदर्शावर नेहमीच स्थिर राहू शकलेला नाही. आपल्या कामाचा व्याप वाढवण्याचा व हरिजनांना कार्यकारिणीत बहुमत देण्याचा संघाला अर्थातच अधिकार आहे. अथवा हरिजनांच्या काही प्रतिनिधींचे एखादे मंडळ संघ तयार करू शकते आणि ते संघाला सल्ला देण्याचे काम करू शकते व संघाच्या कामाची देखरेख करून ते संघाला योग्य मार्गावर ठेवयण्याचे काम करू शकते.
यानंतर हरिजनांच्या उद्धाराकरिता साधू लोकांचे सहकार्य घेण्याचे जे काम ग्वाल्हेर संस्थानात सुरू करण्यात आले होते त्यासंबंधी गांधीजींना सल्ला विचारण्यात आला. उत्तर देताना गांधीजी म्हणाले की हे पाऊल योग्य आहे आहे की नाही आणि असे करण्याचा सल्ला देणे बरोबर राहील की नाही याबद्दल मला गंभीर शंका आहे. यात मला राजकारणाचा वास येतो. या कामात खऱ्या साधूंची मदत मिळू शकली तर मी त्याचे स्वागत करीन. परंतु माझ्या कल्पनेनुसारचे साधू शोधूनही मला या देशात सापडलेले नाहीत. जे काही साधू मला भेटले त्यांना पाहून माझी निराशाच झाली आहे. काही ठिकाणी अपवादात्मक चांगले साधू मिळूही शकतात आणि त्यांच्या मदतीचे मी स्वागतही करीन. परंतु मी स्पष्ट सांगतो की या कामात साधूसमुदायाची मदत घेण्याच्या शक्यतेसंबंधी मला घोर शंका आहे. असा प्रयत्न जरी करण्यात आला तरी त्यांचे आणि आपले मार्ग लवकरच वेगळे होतील अशी मला भीती वाटते.
कस्तुरबा स्मारक ट्रस्टची काही रक्कम हरिजन भगिनींकरिता राखून ठेवली तर ते योग्य होणार नाही काय असे दुसऱ्या एका मित्राने विचारले. गांधीजींनी उत्तर दिले की तुमच्यात या संपूर्ण निधीचा उपयोग करण्याची क्षमता असेल तर तुम्ही संपूर्ण निधी घेऊ शकता. यामुळे या कामाकरिता दर वर्षी काही निधी राखून ठेवण्याची आवश्यकता नाही.
सवर्ण हिंदूंद्वारे हरिजनोद्धाराचे जे काम होत आहे त्याचे धोरण ठरवण्याकरिता मी जबाबदार आहे. त्यांनी प्रायश्चित्त घेतले पाहिजे. मी स्वतःलाच समजावत होतो की आवश्यक पात्रता नसल्यामुळे सर्व हिंदू हरिजनांची कदाचित सरळ सेवा करू शकत नसतील. परंतु पैसे देऊन तर ते या कामाला निश्चितच मदत करू शकतात. सरळ सेवेचे उदाहरण द्यायचे तर ते हरिजन मुलांना स्वतः शिकवू शकत नसतील, परंतु त्यांना शिकवण्याकरिता शिक्षक ठेवण्याकरिता पैसे देऊ शकतील. हासुद्धा प्रायश्चित्त करण्याचा एक मार्ग आहे. असे केले तर हरिजन समाजात मिळूनमिसळून त्यांच्या प्रगतीला ते हातभार लावू शकतील.
अशा प्रकारच्या कामांमुळे अस्पृश्यतेचे पाळामुळासकट उच्चाटन कुठे होऊ शकते अशी शंका घेणारे बांधव आहेत याची गांधीजींना कल्पना होती. एके काळी ते स्वतःही अशी शंका घेणारांपैकी होते. परंतु नंतर त्यांच्या लक्षात त्यांची चूक आली. गांधीजी म्हणाले की याकरिता मी श्री देवधर यांचा आभारी आहे. एके काळी मी त्यांच्या कामाकडे शंकास्पद दृष्टीने पाहत होतो व त्यांच्यावर मी त्या काळात टीकाही करत होतो. परंतु एका वर्षाच्या अनुभवाने माझा सर्व गर्व नाहिसा केला आणि मला नम्रपणा शिकवला. मला जाणवले की सवर्ण हिंदूंच्या हृदयपरिवर्तनाकरिता मी जर केवळ प्रचार कर्याचाच उपयोग केला तर यश मिळण्याकरिता युगांतापर्यंत वाट पाहावी लागेल आणि मध्यंतरीच्या काळात हरिजनोद्धाराचे काम जसेच्या तसेच राहून जाईल. यानंतरच्या अनुभवाने मला असाही विश्वास वाटू लागला की हरिजनांमध्ये काम करण्याकरिता आवश्यक चारित्र्यसंपन्न, निष्ठावंत आणि त्यागभावना असलेले लोक बऱ्याच प्रमाणात मिळाले तर सवर्ण हिंदूंनी काही जरी केले नाही तरी अस्पृश्यता भूतकाळातील गोष्ट होऊन जाईल. परंतु याचा अर्थ असा आहे की आधी आपण अंतःकरणातून हरिजन झालो पाहिजे आणि हरिजनांबरोबर राहून हरिजनांप्रमाणेच काम केले पाहिजे.
गांधीजींनी पुढे विचारले की परंतु हरिजन सेवक संघाच्या लोकांनी अस्पृश्यतेबद्दलची भावना पूर्णपणे काढून टाकली असा दावा ते अंतःकरणपूर्वक करू शकतात काय? त्यांचे कृतीत आणि उक्तीत पूर्णपणे सामंजस्य आहे काय?
एका सदस्याने विचारले की याबद्दलचा तुमचा मापदंड काय.
तुमचा विवाह झालेला आहे काय?
सदस्य - होय, झालेला आहे.
गांधीजी - मग तुम्हाला अविवाहित मुलगी आहे काय? जर असेल तर तिच्याकरिता हरिजन वर मिळवा. असे तिच्या वासनापूर्तीकरिता करायचे नाही तर शुद्ध धार्मिक भावनेने करायचे आहे. तुम्ही असे केले तर मी तुम्हाला माझ्या खर्चाने अभिनंदनाची तार पाठवीन.
आता तुमच्य लक्षात येईल की हरिजन सेवक सवर्ण हिंदूंच्या अंतःकरणाला का स्पर्श करू शकत नाहीत. याचे कारण ना तर त्यांच्या अंतःकरणात श्रद्धेची ती आग आहे आणि ना सेवा करण्याची ती अदम्य भूक. अंतःकरणावर प्रभाव टाकण्याकरिता हिची पहिली आवश्यकता असते. मूठभर सवर्ण हिंदूंनी जर खऱ्या सेवाभावनेने या कार्यात उडी घेतली तर ते संपूर्ण हिंदू समाजाला प्रभावित करू शकतात. परंतु दिखाऊ सेवा करणारांचे सैन्यही त्यांना प्रभावित करू शकणार नाही.
अशा प्रकारची सेवा करण्याकरिता मालवीयजींसारखा निष्ठावंत माणूस पाहिजे. मी तर माझ्या बहिणीतही परिवर्तन घडवून आणू शकलो नाही. आणि मीच जर असे करू शकलो नाही तर मी इतरांना दोष कसा देऊ शकतो? यावरून हा मार्ग किती कठीण आणि काटेरी आहे हे तुमच्या लक्षात येईल. तरीही तुम्हाला वाटत असेल की या कामाकरिता तुमच्यात आवश्यक योग्यता आहे तर तुमच्या भागात तुम्ही हा प्रयोग करू शकता.
गांधीजी पुढे म्हणाले की काही प्रमाणातील या अपयशाचे एक कारण हे सुद्धा आहे की हरिजन सेवक संघाच्या बहुतेक लोकांच्या सेवाकार्यात राजकीय हेतू मिसळलेला आहे.तुम्हाला जर सवर्ण हिंदूंच्या अंतःकरणात खरोखरच प्रवेश करायचा असेल तर तुमचे अंतःकरण शुद्ध धार्मिक भावनेने परिपूर्ण असले पाहिजे. अशा प्रकारच्या कामाकरिता शब्दांची आतशबाजी पुरेशी नसते. आज तर आपण निष्क्रियता, बेफिकीरी आणि मानसिक शैथिल्य या भावनांनी दबलेलो आहो.
अजून एक उपाय आहे. परंतु तो उग्र आणि धोक्याने भरलेला आहे. तो उपाय उपवासाचा आहे.
जेव्हा केव्हा मला उपवास चुकीचा आणि नैतिक दृष्टीने अनुचित वाटला आहे तेव्हा तेव्हा मी त्याची निंदा केली आहे. परंतु उपवासाची जेव्हा स्पष्ट नैतिक मागणी असते तेव्हा त्याच्यापासून माघार घेणे म्हणजे आपल्या कर्तव्यापासून माघार घेणे. असा उपवास विशुद्ध सत्य आणि अहिंसेच्या आधारावर करण्यात आला पाहिजे.
जाता जाता गांधीजींनी सूचीत केले की मला कदाचित या जीवनात अजून एक वा अधिक उपवास करावे लागतील. परंतु सध्या तरी माझा कोणताही उपवास करण्याचा विचार नाही. ही केवळ अस्पष्टशी पूर्वजाणीव आहे.
हरिजन, जुलै २८, १९४६

No comments:

Post a Comment